माधवराव पेशवे आणि गंगोबातात्या चंद्रचूड
गंगोबातात्या चंद्रचूड हे पेशवाईतील एक विचित्र आणि विक्षिप्त प्रकरण. मुळात होळकरांचे दिवाण असलेले गंगोबातात्या यांचं होळकरांशी पटत नसल्याने तिथून दूर होऊन मग राघोबादादांच्या कानाला लागले. राघोबा हा स्वतः मुळात शूर असला तरी नानासाहेबांच्या नंतर गादीच्या इच्छेने पछाडला गेला आणि गंगोबातात्या सारखी माणसं कानाला लागल्याने अजून वाहवत गेला. माधवरावांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा, बाहेरच्यांपेक्षाही घरातला शत्रू जर कोण असेल तर राघोबा. केवळ राज्यबुडवा आणि निर्लज्ज अशीच विशेषणं त्याला शोभू शकतील. उत्तरेत माधवरावांनी पाठवल्यानंतर जाटांच्या हातून मार खाल्ला आणि दक्षिणेत येताना होळकरांच्या मामल्यात तोंड खुपसताना अहिल्याबाईंनी त्याला जो हिसका दाखवला त्याने हा अजून खवळला. अहिल्याबाईंनी स्पष्ट केलं की पेशवे धनी, ते स्वतः हुकूम देतील ते आम्ही मानू, पण इतरांनी सांगितलेलं आम्ही ऐकणार नाही. माधवरावांनीही अहिल्याबाईंची पाठराखण केली तेव्हा राघोबाला दक्षिणेत यावं लागलं आणि होळकरांच्या मामलातीत स्वतःचा स्वार्थ साधू पाहणाऱ्या गंगोबातात्यालाही मान खाली घालावी लागली. पुढे धोडपच्या लढाईनंतर जेव्हा माधवरावांनी राघोबाला वाटेला लावलं तेव्हा गंगोबातात्यासारख्या या लोकांचीही गय करायची नाही असं ठरवलं.
माधवरावांनी गंगोबातात्यावर ३० लाख रुपयांचा दंड बसवला जो भरताना त्याचं कंबरडं मोडेल. गंगोबातात्याने अपेक्षेप्रमाणे असमर्थता दर्शवली. गंगोबाला आधीच नगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवलं होतं, त्याला माधवरावांसमोर आणल्यानंतर त्याने काहीसा उलटसुलट जाब दिल्याने माधवराव अक्षरशः भडकले. गंगोबातात्या, त्यांचा मुलगा यशवंतराव, मेहुणे बाजी विठ्ठल आणि सखंभट यांना पायात बेड्या घालून माधवरावांच्या समोर आणण्यात आलं. माधवरावांनी जाबसाल केल्यावर त्यांनी योग्य उत्तरं दिली नाहीत तेव्हा माधवरावांनी सखंभट, बाजी विठ्ठल आणि यशवंतराव दाजी या तिघांना रक्त ओकेपर्यंत प्रत्येकी तीनशे छड्या मारल्या. यानंतर गंगोबातात्याची पाळी आली. पैसे द्यायला तयार नसलेल्या गंगोबावर माधवरावांनी पहिल्या आठ-दहा छड्याच अशा काही उमटवला कि गंगोबाच्या पाठीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्यावर शंभरापर्यंत आणखी छड्या मारल्या.
चौघांच्याही नाका-कानाला चाप लावले. चाप लावणे म्हणजे चिमटे नका-कानाच्या शेंड्याला अडकवून दराने लटकवलेल्या अवस्थेत ते चिमटे खेचणे. याने प्रचंड नाक आणि कानासारख्या नाजूक भागांना प्रचंड दुखापत होते आणि वेदना होतात. सहज माहितीकरिता सांगतो, कोणी 'उरी' चित्रपट पाहिला असल्यास काश्मिरी माणसाकडून दहशतवादी हल्ल्यांची माहिती घेताना त्याच्या कानाला चाप लावलेले दाखवले आहेत. हे अगदी तसंच. यानंतर मग सगळ्यांच्या पायात बेड्या ठोकून, हाती काढण्या लावून शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजात गारद्यांच्या हवाली केले. तिथून मग या सर्वांची मिरवणूक जाणतेसमोरून पुन्हा नगरच्या किल्ल्याकडे निघाली.
माधवरावांनी एवढी कडक शिक्षा का केली असा प्रश्न पडतो, पण जेव्हा आपण या सगळ्या घटना अभ्यासतो तेव्हा राघोबाला पाठीशी घालणाऱ्या या सगळ्या लोकांना जरब बसणं गरजेचं होतं हे दिसून येतं. माधवराव लहान आहेत तेव्हा आपल्याला धोका नाही असं समजणाऱ्यांना हि चांगली चपराक होती आणि माधवराव कधी काय करतील याचा नेम न राहून पुढे सखारामबापू, चिंतो विठ्ठल रायरीकर, आबा पुरंदरे वगैरे राघोबाच्या हस्तकांनी माधवरावांच्या विरोधात न जाण्याचं ठरवलं जे किमान माधवरावांच्या मृत्यूपर्यंत तरी पाळलं. हरिपंततात्या फडक्यांनी नाना फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात माधवराव पेशव्यांची एकंदर मानसिकता आणि त्यांच्या स्वभावाची भीती व्यक्त केली आहे. अगदी सरळ स्वभाव असलेला हा पेशवा काहीही वाकडं, उलटसुलट खपवून घेत नाही हे प्रत्येक पत्रात दिसून येतं. या सगळ्यामुळे अखेर माधवरावांना उशिरा का वहीन कडक व्हावं लागलं, आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे उत्तरेची रामचंद्र गणेश आणि विसाजी कृष्ण बिनीवाल्यांच्या अधिपत्याखाली जी दिल्ली-पथ्थरगडची मोठी मोहीम झाली त्या मोहिमेत राघोबाच्या या हस्तकांकडून कसलाही अडथळा आणला गेला नाही जेणेकरून मोहिमेत लक्ष द्यायला माधवरावांना उसंत मिळाली.
© कौस्तुभ कस्तुरे